रविवार, १७ जानेवारी, २०१६

विषय: अर्धवट सोडलेला पूल बांधण्याबाबत…


विषय: अर्धवट सोडलेला पूल बांधण्याबाबत…
प्रति,
सर्व पुरुषवर्गास.

महोदय,
     आपल्या सर्वांना हे ठाऊक आहेच की, स्त्रियांचे १० ते ५० हे वय त्याची मासिकपाळी  सुरु असण्याचा सर्वसाधारण काळ. तशी हि अगदी नैसर्गिक- वैज्ञानिक बाब. आपल्या सर्वाचं ह्या भूतलावर असणं हे या गोष्टीशी संबधीत. पण स्त्री-पुरुष यांच्यामधला हाच मुलभूत फरक! प्लेटोने सांगितलेच आहे की, " जे काम पुरुष करू शकतो ते काम स्त्रीपण करू शकते. पण जे काम स्त्री करते ते काम पुरुष नाही करू शकत!”. कदाचित, या कमतरतेची जाण ठेवून, आपण पुरुषांनी स्त्रियांवर अधिकार गाजवण्यासाठी ज्या हजारो कपटी गोष्टी केल्यात, त्याची सुरुवात मासिक-पाळीसारख्या मुलभूत गोष्टींना धार्मिकदृष्ट्या “अपवित्र” ठरवून केली.
   आज सबरीमाला आणि शनी शिंगणापूर मंदिरामध्ये महिलांना समान सन्माननी प्रवेश मिळावा यासाठी आंदोलने होताहेत. सुमारे नव्वद वर्षांआधी काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाची तंतोतंत आठवण करून देणारी हि घटना. त्यावेळेस दलित होते, आता त्या जागी महिला आहेत.
   त्यासाठी येत्या २६ जाने २०१६ ला “भूमाता ब्रिगेड” नावाच्या संस्थेच्या सुमारे ४०० महिलांनी हि जुनाट प्रथा मोडून स्त्रियांना ह्या पवित्रस्थानाची वाट मोकळी करून देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी निवडलेला दिवसही अप्रतिम. ज्या दिवशी आपला देश एक प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला, लोकांच्या हातात खरी सत्ता आली, त्याचदिवशी आपल्याला भारतीय म्हणून प्राप्त झालेल्या अधिकारांचा योग्य वापर करत, प्रजासत्ताक दिन साजरा करणे अनेक अर्थांनी अनुकरणीय आहे.
   काही हिंदुत्ववादी संघटनांनी म्हणे याचा धसका घेऊन त्यांना कांऊटर करण्याची योजना आखलीये.  म्हणताहेत, “जर त्या ४०० महिला परंपरा तोडायला – धर्म भ्रष्ट करायला येणार असल्या, तर आम्ही शनी-मंदिराभोवती २००० महिलांचे ‘संरक्षण कवच’ तयार करणार”.
    ज्या शनी-कृपेमुळे सबंध शनी शिंगणापुरात कुलुपे तर सोडाच पण घरांना दरवाजेदेखील नाहीत, त्याच देवाला हि लोकं संरक्षण देण्याची भाषा करतात. अश्यावेळी(अर्थातच अश्या वेळा अनेकदा येतात!), मला Dante या तत्ववेत्त्याचं “The Divine Comedy” आठवतं. आणि सटायरिकली हसूही येतं. त्यानी ह्या क्रांतिकारक पुस्तकाच्या माध्यमातून युरोपिअन रेनासामध्ये फार मोलाची भूमिका बजावली होती. त्यात तो धार्मिक बुवाबाजीवर म्हणालेला, “They think like a stupid, they look like a stupid and they act like a stupid ”. देव आणि धर्मावर त्याच्यानंतर काही विचारवंतांनी खूप चांगल्या संकल्पना मांडल्या. हेगल म्हणाला, “ God is an universal spirit present everywhere. तर गांधीजी म्हणाले, “God is not a person, God is a principle. बरं, ते म्हणाले म्हणून नाही तर मलापण वेळोवेळी तसा अनुभव आलाय. एखाद्या अवघड प्रसंगी मनोधैर्य वाढवायला शनीदेव नेहमी माझ्यासोबत असतात. खरा देव हा फक्त देवळापुरता सीमीत नसतो. त्याचा वावर सर्वत्र असतो. म्हणजे यांच्या संरक्षण कवचाच्या फार पलीकडे त्याचं अस्तित्व आहे.
   मग हे आंदोलन करण्याची, त्याला पाठींबा देण्याची गरज काय?
   ज्ञानेश्वर माउली पसायदानात म्हणाले आहेत, “दुरितांचे तिमिर जावो...”. गरज आहे ती यांच्यामधील ‘तिमिर’ (अंधार) नाहीसा करण्याची. त्यांना पटवून देण्याची की, बाबारे खरा धर्म तो जो मानवतेकडे जातो. ज्याच्या उपासनेनी “शांती” प्राप्त होते. आणि खोटा धर्म तो असतो जो “वैर” निर्माण करतो. जो म्हणतो, “आम्ही पाहूचं कसं घुसतात ते!”.
   आत्ता सध्यापुरतं आपण देव-धर्माला बाजूला ठेवून थोडा त्याहून अधिक मुलभूत विषय –मानवतेवर बोलूयात. हजारो वर्षांपासुन सर्व प्रकारच्या समाजांमध्ये सोयीस्करपणे स्त्रीयांना दुय्यम काय तर ‘गुलामांसारखी’ वागणूक देत आपण इथपर्यंत आलोत. कालही तेच होतं आणि आजही तेच आहे. आधी, विष्णूचे पाय दाबताना लक्ष्मी दिसत होती, अग्निपरीक्षा देताना सीता दिसत होती. आजच्या आधुनिक जगात, पायलट ऐटीत विमान चालवतो आणि एयर होस्टेस चहा-पाणी देताना दिसतात. डॉक्टर टेबल वर बसल्या बसल्या पेशंट तपासतो आणि नर्स घाणेरड्या जखमांची ड्रेसिंग करतात. आजही घरची स्त्री तिच्या स्वतःच्या घरात सर्वात जास्त राबते. १५-१५ तास अविरत काम करते. तरीही शेवटी १०० रुपय्यांच्या खर्चासाठी तिला मोकळीक नाहीये. हि परिस्थिती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे.
    इतके दिवस स्त्रियांच्या भरवश्यावर खूप  आराम केला यारहो. पण आता कंटाळा आलाय. चेंज करावीशी वाटतीये हि लाईफस्टाईल. पण जे साचलेलं काम समोर दिसतंय ते फार मोठ्ठं आहे. मानवतेचा अर्धवट राहिलेला पूल बांधायचाय. असंही अर्धवट पुलाचा उपयोग नसतोच कधी. पूर्ण केला तर सर्वांनाच फायदा होईल. बरीच लोकं लागतील. म्हणजे आपण सर्वच असलो तर लवकर होईल काम. चला तर मग...     

-धनंजय सरनाईक

१४ टिप्पण्या:

  1. Kharach ataa ya krantisathi pathimba sarvankadun milayla hava.Mast lihila ahes dhananjay....vichar shabdanmadhe surekh mandatos tu :)

    उत्तर द्याहटवा
  2. Ha bridge complete jhala, tar hya jagaat aplyala ajun kontyach bridge chi garaj bhasnar nahi.. Wise words Dhananjay!

    उत्तर द्याहटवा
  3. Excellent Dhananjay......so eloquently presented.....apratim Marathi....felt like....it shouldn't b finished....gave very apt examples.....was an enriching experience.....keep writing....!!!!!

    उत्तर द्याहटवा
  4. खरंच, विचार करायला लावणारी बाब आहे.
    आणि धनंजय नेहमी सारखच "जिंकलास मित्रा "

    उत्तर द्याहटवा