गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

"नोव्हेंबर सुरुवात"


संविधान दिवस आणि एकंदरीत संविधानावर आपल्या देशातील दिग्गजांनी अनेक लेख लिहिले. काही वाचनात आले, तेव्हा विचार केला आपणही बघुयात लिहुन. मग पुन्हा विचार बदलला - आपण कोण? कोण वाचणार ते? त्यापेक्षा दोन-चार लेख अजून वाचून काढुत. मग पुन्हा विचार बदलला. आपण रोजनिशी  इतरांनी वाचण्यासाठी लिहतो? त्यामुळे  मग मी रोज-रोजच्या वाचनातून फारकत घेऊन, हि लिहिण्याची प्रोसेस अनुभवावी असा ठरवलं.

तसा नोव्हेंबर महिना माझ्यासाठी लहानपणापासूनच महत्वाचा. अनेक गोष्टींची माझ्या आयुष्यात याच महिन्यात सुरुवात होण्याची दीर्घ परंपरा. आमच्या परभणी जिल्ह्यातला कारभार तसा थंड बस्त्यातला. इतर जिल्हे त्यांच्या प्रथम सत्र परीक्षा  दिवाळीआधीच उरकून घेत. आमच्या मात्र दिवाळीनंतर ठरलेल्या. त्यामुळे प्रत्येक वर्षी अभ्यासाची सुरुवात नोव्हेंबर मध्ये होत असे.

अभ्यासाची हि "नोव्हेंबर सुरुवात" करण्याची सवय इंजिनीरिंगला आल्यावर तुटली. एक म्हणजे परीक्षा डिसेंबर महिन्यात असत आणि डिसेंबर महिन्याच्या थंडीत कुठे अभ्यास करायचा असतो का? तत्सम  फालतू कारणांमुळे सबंध इंजिनिरिंगमधे माझ्या अभ्यासाची काही सुरुवात होवू शकली नाही. पण, इंजिनिरिंगच्या दिवसांमध्ये सबमिशन करिता जुलैपासून साचलेल्या असाइनमेंट लिहिण्याची "नोव्हेंबर सुरुवात" करावीच लागे. नाही तर घरी लेटर. या धाकाधाकांच्या नोव्हेंबर सुरुवातीमधल्या काही सुरुवाती या फार मनापासून आणि आनंददायी अश्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे व्ही. आय. टी. त मिराज नावाचा फिल्म क्लब सुरु केला - ५ नोव्हेंबर २००९ ला. त्यानंतर दोन वर्षांनी आत्मबोध ( व्हि. आय. टी. मधील विद्यार्थ्यांनी २००६ साली सुरु केलेली एक सामाजिक चळवळ) मधील आम्ही काही मित्रांनी " चॅनल फॉर सिटीझन्स इमर्जन्स" नावाचा चॅप्टर सुरु केला - १४ नोव्हेंबर २०११ ला.

ढोबळमानानी दहावी- बारावीपर्यंत मार्क्स चांगले राहत. इंजिनीरिंगमधले सबमिशन्संसुद्धा दोन- पाच दिवस लेट होत. पण पूर्ण होत. आज, मिराज आणि आत्मबोधचा तो चॅप्टर सुद्धा जोरात चालू आहे. म्हणजे नोव्हेंबर सुरुवात माझ्यासाठी लकी ठरलीये. म्हणून ब्लोग लिहण्याची सुरुवातही याच महिन्यात करतोय!

अशीच एक मोठी "नोव्हेंबर सुरुवात" डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेमधील अनेक दिग्गजांच्या साक्षीने १९४९ ला झाली. आताच्या वर्षापासून अधिकृतरीत्या आजचा दिवस "संविधान दिवस" म्हणून साजरा होणार आहे.

कदाचित काही प्रमाणात चुकतही असेल माझं. पण, आपण नेहमी walk the talk असलं पाहिजे असं कधीकाळी मनात पक्कं बसलंय. म्हणजे कश्यावरही  भाष्य करण्याआधी ते जगुन बघायचं आणि मग त्यावर actively (passively नाही) प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे खूप कमी गोष्टींवर मतप्रदर्शन करण्याचा योग येतो. "संविधान जागृती" हा त्यातला एक.

आत्मबोधमध्ये आम्ही ३०-४० वर्षांच्या पुढच्या वयोगटासाठी संगणक- इंटरनेट शिकाविण्यासाठीच्या कार्यशाळा घेतो. मुळात हे 'मॉडेलच' खूप वैशिष्टपूर्ण आहे. यामध्ये इंजिनीरिंग कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे तास संपल्यानंतर कॉलेजच्या प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यापेक्षा वयस्क लोकांना संगणक शिकण्यासाठी प्रेरित करतात. अर्थातच मोफत. यामध्ये आम्ही गेल्या चार वर्षांपासून -शिकविणारे विद्यार्थी  आणि शिकणारे जेष्ठ मंडळी या दोघांकरिता "संविधान जागृती" नावाचा दर दिवशी १५-१५ मिनिटांचा  उपक्रम घेतो. एक-एक विद्यार्थी संविधानाच्या वेगवेगळ्या भागाचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचे सादरीकरण इतरांसमोर करतो.

या उपक्रमाचा उद्देश हा संपूर्ण संविधान A-Z शिकविणे असा नसून, सर्वांना त्याचे महत्वाचे वैशिष्ठे समजावून सांगणे, नागरिकांना त्यांचे मुलभूत हक्क तसेच कर्तव्यांबाबत अधिक सजग करणे, आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या कलामांचे आपल्या जीवनामध्ये असलेले महत्व विशद करणे आणि एकंदरीतच संविधानाप्रती सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे असा आहे. आत्माबोधचे "Digital literacy workshop" आणि "संविधान जागृती" ह्या  कार्यक्रमासारखे स्वरूप मोठ्या प्रमाणात - देशपातळीवर "Digital India" आणि "संविधान दिवस" याच्या रूपाने दिसत आहे. कालच मी माझा मित्र अनुपला म्हणालो, " अरे बघ, मोदिजी कश्या आपल्या आयडिया चोरताहेत!". यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी आज संपूर्ण देशात  "संविधान दिवस" उत्साहाने साजरा होत आहे. शाळा-शाळांमध्ये प्रस्ताविकेमधील 'धर्मनिरपेक्ष', 'न्याय', 'समानता', 'बंधुता' या शब्दांचे मोठ्या-मोठ्याने वाचन चालू आहे. परंतु, आपण सर्व भारतीयांनी या शब्दांचा संविधानाला अभिप्रेत असलेला अर्थ समजावून, त्याला अंगीकृत करून घेण्याचा प्रयत्न केल्यास मोदिजींची हि "नोव्हेंबर सुरुवात" एक नेहमीसारखा इव्हेंट न ठरता  त्यातून बरंच काही साध्य होऊ शकेल.

जय हिंद!!!

धनंजय सरनाईक